नमस्कार मित्रांनो,
आज आम्ही तुम्हाला एक असा स्वामींचा सत्य अनुभव सांगणार आहोत ज्यामुळे तुमच्या डोळ्यात पाणी येईल.
यशोदा मामी प्रत्येक कामात असताना त्यांचे स्वामींचे नामस्मरण चालूच असे. आज भल्या पहाटे पासून त्यांनी गुरुचरित्राचे वाचन देखील केले होते आणि नामाचा जप तर अखंड चालू होता.
अण्णा मामांच्या घराला देव-धर्म हा काही नवीन नव्हता. दहा-बारा वर्षांपूर्वी मामांनी मामींना अक्कलकोटला नेले होते. तेव्हापासून मामींना स्वामींची ओढ लागली ती लागली.
यशोदा मामी म्हणजे अख्ख्या गावाच्या मामी. गोल भरलेला चेहरा, नाकी डोळी नीटस, उजळलेला सावळा रंग, अंगावरची नऊवारी साडी आणि कपाळावर आठ आण्याएवढे कुंकू. मामी आणि मामांचे प्रसन्न व्यक्तिमत्व अख्या गावाला माहीती होते.
सकाळपासून किंबहूना काल रात्रीपासून मामी जरा अस्वस्थ होत्या. गेले दोन दिवस कधी नव्हे असा मुसळधार पाऊस चालू होता. पावसाचे काही नाही मात्र घरात अवघडलेली सून शांता. सरकारी दवाखान्यातल्या नर्स येऊन गेल्या.
आणि म्हणाल्या की, इथे उपकेंद्रात बाळंत होण्यासाठी दिसत नाही. कारण बाळ फिरलेले दिसते. तालुक्याला न्यावे लागेल. तेव्हापासून मामीचा डोळ्याला डोळा नव्हता. कारण शांताचे दिवस भरलेले होते.
कालपासून गावाबाहेरच्या ओढा तुडूंब वाहत होता. इकडचा माणूस तिकडे आणि तिकडचा माणूस इकडे येत नव्हता. गाडीची व्यवस्था झाली होती पण जाणार कसे? वरून शांताला आज सकाळपासूनच दुखायला सुरू होते. तिला कळा यायला लागल्या होत्या.
इकडे मामा देखील चिंतेत होते. मुलगा काल पलीकडच्या गावी गेला होता. तो तिकडेच अडकलेला आणि त्यात सून बाईंचे भारलेले दिवस. त्यांनी गाडीची सोयदेखील केली. पण पलीकडे जाणार कोण?
अस्वस्थ मामा वाड्यात येरझाऱ्या घालत होते. एकमेव उपाय म्हणून मामींनी गावातल्या एका जुन्या सुईणीला निरोप धाडला होता. भल्यापहाटे पांडू निरोप घेऊन गेला होता. पण ती जागेवर नव्हती. तर आजूबाजूला आली की ताबडतोब पाठवून द्या असे सांगून तोदेखील परत आला होता.
त्यात शांताच्या कळा वाढायला लागल्या होत्या. मामींनी दहा-बारा वर्षांपूर्वी एकदा काही सुविधा नसल्याने आपल्या मुलीचे घरीच बाळंतपण केले होते. पण आज ती स्थिती नव्हती. त्यावेळी सगळे बाळंतपणे घरीच व्हायची.
आता वयाने थरथरणाऱ्या हातांना बाळंतपण करणे जमणार नव्हते. तरीदेखील त्या खंबीर बाईने सगळी तयारी करून ठेवली होती. सुती कपडे, गरम पाणी आणि नाळ कापण्यासाठी कोरे ब्लेड पान देखील.
माझ्या स्वामींनी वेळ आणली तर त्यांच्यावर भार सोपवून ती सगळे करणार होती. देवाचा धावा करत मामा सुनेच्या खोलीबाहेर फेऱ्या मारत होते. त्यांनी पुन्हा एकदा पांडूला बघून यायला सांगितले. काही वेळात पांडू देखील हात हलवत परत आला.
कोणी आहे का घरात? कसा बाहेरून घरात आवाज आला. सुईण आली म्हणून मामी बाहेर पळाल्या पण बाहेर दुसरीच कुणीतरी होती. एखाद्या घरंदाज घरातील वाटावी आणि चेहरा चंदनासारखा नितळ. मामाने तिला विचारले तर ती म्हणाली, रमा आजींनी पाठवले आहे.
म्हातारपणी त्यांच्यापेक्षा हे काम मी चांगले करीन म्हणून. मामींचा जीव आता भांड्यात पडला. त्यांनी आनंदाने तिला पायावर पाणी घ्यायला लावून घरात घेतले. मामींनी सर्व पूर्वतयारी करून ठेवली होती. आता मामा-मामी दोघांनाही हायसे वाटले होते.
बराच वेळ शांताचा ओरडण्याचा आवाज बाहेर येत होता. पण त्यापाठोपाठ लहानग्याचा रडण्याचा आवाज वाड्यात घुमला तसे मामा खुर्चीवर बसले. मामींना काय करू आणि काय नाही असे झाले होते.
बाळ फिरले होते पण सुईणीने डॉक्टरांना जमणार नाही अशा पद्धतीने बाळंतपण केले होते. बाहेर येत मामींनी गोड बातमी मामांना दिली. बाळ आणि शांता दोघेही सुखरूप आहेत असे सांगितले. सगळं काही व्यवस्थित करून ती सुईण निघाली तेव्हा मामींनी चहा टाकला आणि म्हणाल्या, तुला कधी गावात नाही पाहिले.
तेव्हा ती म्हणाली, मी राजश्री. रमा आजींच्या लांबच्या नात्यातली. चहा नंतर मामी ओटी भरू अशा म्हटल्या. पण ती नंतर येते असे सांगितले आणि निघून गेली. मामी तिच्या पाठमोर्या आकृतीकडे पाहतच होत्या.
दिवस मावळतीला आला होता आणि दुपार पासून पाऊस कमी झाला होता. बाळ शांत झोपला होता. मामाचा मुलगा रमा सुईणीला गाडीवर घेऊन धडपडत आला होता. बायकोला कळा येत आहेत हे त्याला माहिती होते आणि उशीर होऊ नये म्हणून ओढ्याचे पाणी कमी झाले तसे तो अलीकडेच अडकलेल्या सुईणीला गाडीवर बसून लगबगीने घरी पोहोचला.
सगळ्यांचे हसत चेहरे बघून त्याला हायसे वाटले. मामींनी सगळी गोष्ट सांगितली. तेव्हा म्हातारी रमा सुईण म्हणाली, तुम्ही म्हणताय तशी कोणीच माझ्या नात्यात नाही. मामा आणि मामी एकमेकांकडे पहात राहिले.
मामी लगेच पळाल्या आणि स्वामीं पुढे साखर ठेवली आणि म्हणाल्या, महाराज भक्तांसाठी तुम्ही अन्नपूर्णा देवीचे रूप घेतलेले होते. आज पुन्हा सुईणी चे रूप घेऊन तुम्ही माझ्या सुनेला सोडवले. माझ्या नातवाचे मोठे भाग्य म्हणावे लागेल की जनमताच स्वामींचे हात त्याला लागले.
चिंब भिजलेल्या डोळ्यांनी मामी अनेक तास स्वामींच्या समोरच बसून होत्या.
अशाप्रकारे पुन्हा एकदा स्वामींनी त्यांच्या भक्तांना आपल्या अलौकीक चमत्काराने सांगितले की भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.
श्री स्वामी समर्थ.
माहिती आवडली असेल तर अवश्य शेयर करा. अशाच माहिती पूर्ण पोस्ट साठी आमचे फेसबुक पेज फोकस मराठी लाईक आणि फॉल करायला विसरू नका.
वरील माहिती हि ज्योतिष शास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा फोकस मराठी पेजचा हेतू नाही. अधिक माहिती साठी तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.
माहिती आवडली असेल तर आपल्या मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेयर करा. अशाच राशी संबंधी पोस्ट रोज वाचण्यासाठी आमचे फोकस मराठी हे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका.